फाटक्या पदरात अमुल्य रत्नं का बरं टाकत असेल देव?



गावातल्या माळावर त्यांचा पाल पडलेला होता. कित्येक दिवस गावात राहिल्यानंतर आज त्यांनी आपली पालं उचकटली होती. सगळं समान गाडीवर घातलं. सोबतची सगळी लोकं पुढे निघून गेली होती. मागे एक बाप आणि त्याच्यासोबत तीन चार वर्षांचा छोटा मुलगा. बहुतेक त्याला घेऊन आता तो निघणार होता. पण त्या मुलाचं काही तरी बिनसलं होतं आणि तो रडत होता.

टेन्शन वाढलेल्या बापाने पायातली चप्पल काढली आणि त्या छोट्या लेकराच्या पाठीत धपाधप चार-पाच फटके हाणले. असह्य होतं ते दृश्य. पण काय करणार होते. त्याच्या हातातून त्याचं मुल हिसकावून घेण्याइतपत तर धाडस नव्हतं. शेवटी तो बाप होता. माझी उपरी माया त्यापुढे किती दिवस टिकली असती...? पण त्यावेळी जाणवलेली वेदनाही खोटी नव्हती. आज कित्येक वर्षांनी अचानक तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला आणि आजही माझ्या डोळ्यात पाणी आलंच.

हतबलपणे अशा प्रसंगाचं साक्षीदार होणं, हेही एक दु:खच!

या अशा प्रसंगानीच तर शिकवलं आपल्या दुखाचा कधी बाऊ करायचा नाही. रडायला होईल. पडायला होईल. पण लढण्याची ताकद कधी गमवायची नाही. कारण, इथे प्रत्येकाच्या वाट्याला आपापली लढाई आहेच. ती कुणालाच चुकलेली नाही. तरीही एकच प्रार्थना आज ते मुल जिथं असेल तिथं सुरक्षित असावं बस्स!

फाटक्या पदरात अमुल्य रत्नं का बरं टाकत असेल देव?

Post a Comment

3 Comments

Anonymous said…
हृदय स्पर्शी खूप छान
Anonymous said…
खूपच सुंदर लिखाण मी पण पाहिले आहे असा प्रसंग मन भरून येतं पण आपण काहीच करू शकत नाही. प्रेरणा देणारे हे लिखाण आहे
तीचं आठवण घेऊन याची कथा पूर्ण करा. त्या रडणाऱ्या मुलाची एखादी कथा तयार करा ...ते पोर का रडत असेल याची.