पुष्पा : द राईज प्रचंड आशावादी तरीही निराश करणारा चित्रपट!

सध्या पुष्पा : द राईज (पार्ट १) या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. एकूण चार भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी तर नुसता कल्ला केला आहे. पुष्पाच्या ट्रेंडींग गाण्यावर आणि डायलॉगवर रील्स बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नर पासून ते हार्दिक पांड्या पर्यंत सर्वांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत. यावरूनच पुष्पाच्या लोकप्रियतेने किती मोठे टोक गाठले आहे लक्षात येते.

 

Image source Google

एक साधा लाकूड तोडणारा मजूर ते लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा प्रमुख असा सामान्य माणसाच्या यशाचा प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकात नाविन्यपूर्ण असे काहीच नाही. तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेण्याचे कारण म्हणजे यातील डायलॉग, मसाला, सीन, आणि गाणी.

 

सामाजिक वास्तव दाखवण्यात चित्रपट यशस्वी ठरला असला तरी या वास्तवातून जे सत्य अधोरेखित होते ते भ्रमनिरास करणारेच आहे. पुष्पा (अल्लू अर्जुन) हा या चित्रपटाचा नायक. जो एका वंचित घटकाचे प्रतिनिधित्व करतो. जाती-वर्गनिहाय त्याचे समाजातील स्थान अत्यंत गौण आहे. पण त्याला सन्मान हवा आहे. (जो की प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे पण तो मिळवण्यासाठीही काही लोकांना संघर्ष करावा लागतो)

 

आपले स्थान बदलण्यासाठी त्याने केलेला हा संघर्ष सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा आहे. एकाच वेळी पन्नास-साठ गुंडांना पळवून लावणं, आपल्या प्रत्येक शत्रूला पुरून उरणं, त्यांचा प्रत्येक डाव शिताफीनं आणि हुशारीनं त्यांच्यावरच उलटवणं, अशा सगळ्या आघाडीवर त्याला स्वतःची हुशारी आणि कर्तबगारी सिद्ध करावी लागते. शिवाय, स्त्रीयांसाठी तर आपण एखाद्या मसीहा पेक्षा कमी नाही, ही अधिकची जबाबदारीही पेलावीच लागते.

 

‘सबसे बडा रुपय्या या तत्वानुसार तो एनकेन प्रकारेण पैसा मिळवण्यात यशस्वी होतो. पण, सन्मान? याबाबतीत मात्र शेवट पर्यंत त्याचा संघर्ष संपत नाही.

 

चित्रपटातील नायकाकडे जे गुण हवेत ते सगळे असूनही पुष्पाला एका ठराविक वर्गाकडून मान्यता मिळते मात्र एका वर्गाकडून त्याची सतत हेटाळणी होत राहते. कारण, या समाजात राहायचे तर तुमच्याकडे एक ब्रँड हवा. हा ब्रँड तुम्ही समाजातील कुठल्या स्तरात आणि कुणाच्या पोटी जन्म घेतला आहे यावरून ठरतो. पुष्पाची कमजोरी हीच आहे की, त्याच्याकडे असा ब्रँड नाही कारण, त्याच्या नावामागे त्याच्या बापाचे नाव नाही. त्याचे सावत्र भाऊ त्याला आपल्या रक्ताचा, नात्याचा मानत नाहीत. तो विधिवत लग्न केलेल्या पत्नीपासून झालेला औरस पुत्र नाही.  बापाचं नाव नसलं तरी आपल्याकडे आई आहे, असे तो म्हणत नाही. उलट या गोष्टीची त्यालाही मनापासून खंतच आहे, म्हणून तर पन्नास गुंडांना अंगावर घेणारा पुष्पा या एका मुद्द्यावर मात्र तोंड पाडून बसतो. पुष्पाची ही कमजोरी प्रत्येकवेळी त्याच्यावर मात करते पण, आता तो या कमजोरीशी लढण्यास सिद्ध झाल्याचे शेवटी तरी दिसते. (यात तो कितपत यशस्वी होतो हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्कीच पहावा  लागेल)

 

Image source Google

पुष्पा सामान्यते कडून असामान्य बनण्याच्या या प्रवासात यशस्वी झाला असला तरी त्याला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तवात कुठलाच पुरुषाला जे शक्य नाही ते फक्त पडद्यावरील नायकच शक्य करून दाखवतो. अशक्यतेला शक्यतेत बदलवणारी ही फँटसीच पुष्पाच्या यशाचं खरं गमक आहे.

 

एका सामान्य पुरुषाला सन्मान मिळवण्यासाठी जर इतका संघर्ष करावा लागत असेल तर या समाजात स्त्रियांची अवस्था काय असेल? इथे स्त्रियांची इज्जत त्यांच्या कौमार्याशी जोडलेली आहे आणि तिचा अवास्तव बाऊ करण्यात आलेला आहे. दुर्दैवाने चित्रपट असो की वास्तव हे सत्य मात्र कधीच बदलत नाही.

 

समाजात वावरताना स्त्रियांना सतत काचेचं भांडं जपण्याची भीती बाळगतच जगावं लागतं. दुर्दैवाने चित्रपटाच्या  नायिकेलाही यातून सूट मिळत नाही. (नायकाला मात्र ऐनकेन प्रकारेण उन्नती करण्याची मुभा आहे, या पार्श्वभूमीवर हा विरोधाभास थोडा खटकतोच!)

 

पुष्पा श्रीवल्लीच्या एका नजरेसाठी तरसत असतो. त्याची ही तडफड बघवत नाही म्हणून त्याचा मित्र श्रीवाल्लीच्या मैत्रीणीना सांगतो की, तुम्हाला एक  हजार रुपये देतो पण एकदा श्रीवल्लीला पुष्पाकडे पाहून एक स्माईल द्यायला सांगा. एक हजार मिळत असतील तर एक स्माईल द्यायला काय हरकत आहे? पण श्रीवल्लिला काही हे पटत नाही. मैत्रिणींनी एक हजार रुपये घेतलेले असतात. मैत्रिणीच्या दबावामुळे ती त्याच्याकडे पाहून स्माईल द्यायला तयार होते. तिने स्माईल देताच पुष्पाचे धाडस वाढते आणि तो तिला विचारतो मी आवडतो म्हणूनच तू मला पाहून हसली ना? असं विचारताच ती आपल्या हसण्या मागचं खरं कारण सांगते. प्रेम म्हणून नव्हे तर पैशामुळे ती हसल्याचं कळतं तेव्हा तो थोडा दुखावला जातो. पैशासाठी स्माईल देणारी मुलगी पैशासाठी आपण म्हणेल ते ऐकेल का हे तपासण्यासाठी असेल तो तिला एका पप्पीच्या बदल्यात पाच हजार देण्याचे आमिष दाखवतो. पुन्हा एकदा मैत्रिणी तिला भरीस घालून त्याच्याकडे आणतात पण श्रीवल्लीला हा सौदा मंजूर नसल्याने ती रडून तिथून निघून जाते. आपण केलेल्या या आचरटपणाचा पुष्पाला थोडा देखील पश्चाताप होत नाही. उलट पप्पीसाठी हिचा नवरा व्हायचा असेल तर मी त्यासाठी तयार आहे, असे म्हणत तो श्रीवल्लीशी लग्न करण्याचे निश्चित करतो. सगळीकडे मै झुकेगा नही साला म्हनानंरा पुष्पा श्रीवल्लीच्या बाबतीत मै झुकनेको तैय्यार है म्हणतो.

पाच हजारच्या बदल्यात पप्पी घेण्याची कल्पना त्याला अजिबात किळसवाणी वाटत नाही की नंतरही त्याला त्याचा थोडासादेखील पश्चाताप जाणवत नाही. हा प्रकारही थोडा खटकणाराच आहे.  प्रेमात पैसा ओतावा लागतो या समजूत त्याच्या डोक्यात फिट्ट बसलेली दिसते जी की आणखी निराश करणारी आहे.

 

“मै शादी के बादही अपने पती को चुम्मी देगी,” म्हणून रडणाऱ्या श्रीवल्लीसाठी अब्रू हीच एक मोठी कमजोरी आहे. तिच्या समोर त्याशिवाय दुसरी कुठलीच टास्क नाही. तिला एक्स्ट्रॉ ओर्डीनरी ठरवण्यासाठी फक्त हेच काम करायचं आहे. जिथे ती कमजोर पडेल तिथे तिचा नायक तिचा संरक्षक म्हणून उभा राहीलच. स्वतःची इज्जत जपण्यासाठी त्याला आपल्या कुटुंबातील सर्व स्त्रियांची इज्जत जपावीच लागेल. त्याची मर्दानगी त्याशिवाय सिद्ध होतच नाही.

 

चित्रपटातील खलनायक जो चंदन तस्कर टोळी प्रमुखाचा धाकटा भाऊ आहे. त्याला रोज वेगवेगळ्या स्त्रियांशी संभोग करण्यात मर्दानगी वाटते. अगदी गावातील कोणाचीही नवी नवरी आधी याच्या मालकीची मग तिच्या नवऱ्याच्या. त्याची नजर पुष्पाच्या प्रेयसीवर पडते. तिला वाचवण्यासाठी आणि त्याला खरी मर्दानगी शिकवण्यासाठी पुष्पा त्याला अशी मारहाण करतो की चित्रपटाच्या शेवटपर्यंत तो अंथरुणातून उठतच नाही. आपल्या प्रेयसीवर कुणाचा वाकडा डोळा पडलाच तर त्याची काय हलत होऊ शकते हे पुष्पा दाखवून देतो.

 

कुणाशीही पंगा घेण्यात पुढाकार घेणारा, मै झुकेगा नही साला म्हणून ताठ उभा राहणारा पुष्पा प्रेमाच्या आणि प्रेयसीच्या बाबतीत मात्र कमालीचा हळवा आहे. प्रेम ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यातही पुरुषाने प्रेम करणाऱ्या स्त्रीला जर सुरक्षा दिली नाही आपलं नाव दिलं नाही तरी तिची अवस्था काय होते याचे जिवंत उदाहरण त्याच्या आईच्या रुपात त्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रेयसीला प्रोटेक्ट करण्यात कुठेच कमी पडायचं नाही, हे चलेंज त्याने आपसूक स्वीकारलेलं आहे. तिचे हट्ट पुरवणं आणि तिला सुरक्षा कवच पुरवणं या दोन्ही जबाबदाऱ्या त्याने आनंदाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या आहेत. स्वप्नातील राजकुमार या अभिजात कॅटेगरीत बसण्यास तो अगदी सक्षम आहे.

 

एकूणच समाजातील या भूमिकेत अजून पर्यंत काहीच फरक पडला नाही आणि चित्रपटही याबाबत बदलायला तयार नाहीत. लैंगिक समानतेच्या बाबतीत मात्र पुष्पा सपशेल फेल ठरला आहे. कारण, यात स्त्रियांची स्वप्ने, त्यांची कर्तबगारी, त्यांचे स्थान हे त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या स्थानावर अवलंबून आहे. पुष्पाची प्रेयसी असो की आई त्यांचा सन्मान त्यांच्या जोडीदाराच्या म्हणजेच पुरुषाच्या सन्मानावर अवलंबून आहे. हेच सत्य होतं आणि आजही आहे.

 

पुरुष स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणताही मार्ग वापरू शकतो, त्याला सगळे पर्याय खुले आहेत मात्र, हा नियम स्त्रियांना लागू होत नाही. (मग त्या वास्तवातल्या असोत नाही तर पडद्यावरील)

 

 

वर्ग-जाती संघर्षाच्या बाबतीत चित्रपटाने एक आशादायी चित्र निर्माण केले असले तरी लैंगिक समानतेच्या बाबतीत मात्र चित्रपट अतिशय निराशाजनक आहे असेच म्हणावे लागेल.    

 

बाकी तर्क गुंडाळून ठेवून फक्त फँटसी म्हणूनच पाहायचा असेल तर, चित्रपट उत्तम आहे. सामान्य माणसाच्या असामान्य ठरण्याच्या भावनांचे विरेचन करण्यात हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही.

 

मेघश्री श्रेष्ठी

 

 



Post a Comment

2 Comments

खूप वेगळ्या पद्धतीने समीक्षा केलेली आहे. आवडली. ❤️
अचूक विश्लेषण !
पुष्पा अँग्री यंग मॅन ची च आवृत्ती आहे, त्यात नवीन काही नाही.