स्वातंत्र्य म्हणजे काय?
ती मला विचारत होती, “स्वातंत्र्य म्हणजे काय?”
मी पण बावरले, असा काही प्रश्न आपल्याला कशाला कोण विचारेल? नाही का, काय सांगावं बरं, “मग मी मला आठवेल तसं सांगितलं १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाला वगैरे, शाळेत असताना शिकलेलं, आत्ता थोडीच सगळं आठवतंय! पण सांगितलं, मोडकं तोडकं जमेल तसं. पण आत्ता मीही थोडी धास्तावले, काय माहित आता परत काय विचारतील ही पोर, आपल्याला कुणी शहाणं समजलं तर धास्तावायला होतं, नाही समजल तर चिडायला होतं. ती मुलं परत हसलीत, त्यांच्या कळकट चेहर्यावरच हसु खुपच चमकदार होतं पण,
माझ हसणं हल्ली मलाच अस चमकदार वाटत नाही, का बरं?
म्हणजे त्यांचे चेहरे कळकट मळकट आहेत म्हणुन का मला त्यांच हसु जास्त तेजस्वी वाटतंय?
त्यांनी परत विचारलं काय असतं स्वातंत्र्य म्हणजे?
मी परत दचकले, कशाला हवंय यांना काय असत स्वातंत्र्य ते? मग म्हणाले, म्हणजे, आपण आपल्याला हवं ते खाऊ शकतो, हवं तिथं जाऊ शकतो, जे मनात येईल ते करु शकतो. हुश्श अरे वा जमलं की मला पण, फेकायला, फाडफाड, (मी स्वतःचीच पाठ थोपटली)
ती टाळ्या वाजवुन हसत होतीत, माझ्या स्वातंत्र्याच्या व्याख्येवर,
परत तसच ते निरागस आणि आकर्षक हसु, मला वाटलं, यांना जरा आपण स्वच्छ अंघोळ घातली तर अजुन सुंदर दिसतील नाही हसताना, (ये बाई तुझ्याच पोरांना अंघोळ घालताना जीव घाम्याघुम होतो, लागली त्यांना अंघोळ घालायला, पाणी फुकट नाही येत, बिल भरावं लागत आपल्याला, तु कशाला आलेली? पाय मोकळे करायला न? माझ्या व्यवहारी मनानं मला जाग केल)
हो विसरलेच मी पाय मोकळे करायचे होते मला, किती दिवसांनी बाहेर पडले नाही का? एरवी जमतच कुठे ईच्छा असुन पण!
परत त्यांचे प्रश्न, “आपल्याला हवं तसं जगायचं? हवं ते खायचं? काही पण काय सांगताय? आम्हाला रोज वाटतं, पोटभर खावं, मस्त गरम भाकरी, भाजी, लोणी, पण बाबा आणत नाय, मग असेल तीच भाकरी खातो आम्ही पुरवून. त्यातील एक जण म्हणाला. मला पण वाटतं चांगले फ्रॉक घालावे, केसात फुलं घालावी,” ती म्हणाली, आता मला कोरड पडली, यापुढे मी किती आणि काय फेकणार?
मी विषय बदलला, तुम्ही शाळेत नाही जात का? ती म्हणाली “नाही मला नाहीच आवडत शाळा, आई म्हणती काय करणार शिकुन परवडत नाय आपल्याला, शिकायला”, छोट्या पोराकड बोट करुन, “आई, कामावर गेली की याला कोण घेणार?”
हंम्म, (आता, झाले पाय मोकळे जाव का घरी?)
त्यांना टाटा बायबाय करुन मी निघाले,
ही मुलं सुद्धा स्वतंत्र भारताचे भविष्य वगैरे आहेतच की. म्हणजे यांना पण स्वातंत्र्य आहेच की. नाही का? स्वच्छ राहण्याचं किंवा न राहण्याचं, पोटभर जेवण्याचं किंवा न जेवण्याचं, शाळेत जाण्याचं किंवा न जाण्याचं सुद्धा! पण हे सगळ परवडायला हवं. शेवटी स्वातंत्र्य ही परवडण्याची गोष्ट असते!
© मेघश्री श्रेष्ठी.
Comments