काय सांगू तुला?



काय सांगू तुला मी रोज किती झुरतो,

असावं गळत नाहीत पण रोज रडतो,

तुझा हात धरून चालताना, वाटलं आभाळ हाती आलं,

नाचली माझ्या अंगणात जेंव्हा तुझी इवली पावलं,

तुझ्या पहिल्या रडण्यानं,

फुलवली अगणित स्वप्नं,

माझ्या डोळ्यात.

तुला मिळावं,

तुझं आभाळ म्हणून, राबलो जन्मभर,

ताईत बनवून तुला,

बांधली गळ्यात.

चार दिवसांच्या प्रेमासाठी,

विसरलीस;

तुझ्या डोळ्यांनी जग बघणारा बाप.

बापाच्याच पाठीत,

सुरा खुपसण्याच केलंस पाप.

शिकवलं भरपूर तुला,

 म्हणून आज हसतो हा समज मला.

त्यांच्या हातात आता चांगलंच हत्यार मिळालंय,

हसून कुत्सितपणे म्हणतात,

याच्या पोरीनं,

जातीबाहेर लग्न केलंय.

खरा असेल जातीवंताचा तर,

घडवील अद्दल तिला,

समाजाचा हा क्रूर न्याय

नाही कळायचा तुला.

भाऊ-बहिण नातेवाईक सगळ्यांनीच वाळीत टाकलय मला,

आयुष्याच्या कातरवेळी सार्यांनीच दगा दिला.

आपल्याच माणसांशी लढण्याची नाही आता हिम्मत,

व्यवस्थेच्या कायद्याला काळजाची नाही किंमत.

© मेघश्री श्रेष्ठी-नाईक.




Post a Comment

1 Comments

Unknown said…
खूप सुंदर