Posts

Showing posts from March, 2018

मी चुकते...

अंगात ताप थंडी असतानाही, मी भिजवते बदली भर कपडे, काढत राहते मळ, हात दुखेपर्यंत, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. पायात गोळे येतात, पाठ ताठते उभी राहून, तरी भाजते भाकर्या, शिजवते डाळ-भात, पोटात ठरत नाही अन्नाचा कण तरी, विचार करते, मी नाही केलं तर, उपाशी राहतील लेकरं, दिवसभर थकलेल्या तुला काही झालं तरी मिळायलाच हवेत दोन मायेचे घास, म्हणून रांधत राहते पुन्हा तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तो रडू नये, तुला होऊ नये   त्रास त्याच्या आवाजाचा, म्हणून मांडीवरच घेऊन त्याला, अवघडून बसते रात्रभर, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस. तुला जायचं असतं ऑफिसला, तेंव्हा तुझ्या आधी उठून, आवरते डबा आणि तुझा नाष्टा, मात्र तुझ्या आधी, घासही घालत नाही तोंडात, तेंव्हा म्हणत नाहीस तू चुकतेस. तुझे नातेवाईक येणार म्हणून, कुठे जयाचय समारंभाला, तुझ्यासोबत म्हणून, मी रजा टाकते, एक दिवस कामाला बुट्टी मारून, मिरवते तुझ्यासोबतच सहअस्तित्व, तेंव्हा म्हणत नाहीस, तू चुकतेस....

मी कोण?

मी खूप सभ्य आहे, असं ते म्हणतात... मी फारच शांत आहे, असंही तेच म्हणतात... मी कधीच वागत नाही, अल्लड, अवखळ... हे सुद्धा तेच म्हणतात, मी सोशिक, समंजस आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी सात्विक, सुशील आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी घराची मर्यादा आहे म्हणे, असं ते म्हणतात... मी संस्काराची शिदोरी आहे, असं ते म्हणतात... मी गुणवान आहे, रूपवान आहे, भाग्यवान आहे, असंही तेच म्हणतात... माझ्या निरुपद्रवी व्यवहाराचा, खरा मुखवटा त्यांनी ओळखला नाही अजून, ते ओळखतात जिला, ती मी न्हवेच... त्यांना नाही माहित, माझ्या मानसिक स्वांतत्र्यावर, भावनिक आवेगावर, बौद्धिक अस्तित्वावर सतत ... चढणाऱ्यांच्या बुडाखाली स्फोट करण्यासाठी... दारुगोळा जमा करणारी, मीही एक 'फुलन' आहे. © मेघश्री श्रेष्ठी-नाईक.

तरंग....अंतरंग

तरंग....अंतरंग 'छे! काहीच सुचत नाहीये....भुणभुण भुणभुण किडे भुणभुणतायत डोक्यात. का होतय असं....!!  आत्ता कधीच  बाहेर नाही का पडता येणार याच्यातून....?? बाहेर...?? बाहेर...?? कशातून बाहेर पडायचंय आपल्याला नेमकं?  ते तर कळतंय का आपल्याला....? छे...! जे काळतही नाही आणि वळतही नाही, त्याचा असा जीवाला लाऊन  घेऊन वेड्यासारखा विचार करत राहणं कितपत योग्य....??? जाऊदे आपण नकोच विचार करायला....  थांबवायला हवं आत्ताच्या आत्ता.... आत्ताच्या आत्ताच. शांत राहणं.... शांत.... शांत.... एव्हढंच करू शकतोय  आपण सध्या. बस्स.... शांत राहता यायला हवं. एकही शब्द उमटू नये आत्ता मनाच्या पटलावर एकही. शांत...  शांत....शांत....' "ये पोरी, लक्ष कुठाय? अग त्या पोराला चार की, काय तर जरा... किती वेळ झालाय खेळतंय ते एकटच... आं...  तेच्या एक ध्यानात येत नाही तुला ते काय कळतंय का न्हाय? व्हय तसं बसलं मोकळच म्हंजी झालं काय? उठ  उठ बाई, चार त्या पोराला काय तर....!!" सासूनं आवाज दिला, तशी ती उठली आणि पोराजवळ गेली. 'आत्ता किती वेळा चाराय...